साबरकांठा : कोरोनाचा विषाणू जगभरात पसरल्यानंतर अनेकांना यामुळे जीव गमवावा लागला होता. या व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला होता. करोडो लोकांना याची लागण झाली होती. काही बरे झाले तर ज्यांना इतर आजार होते त्यांना जीव गमवावा लागला होता. या व्हायरसची दहशत अजूनही लोकांमध्ये दिसते. असं असताना आता आणखी एका व्हायरसने चिंता वाढवली आहे. या व्हायरसला चंदिपुरा व्हायरस असं म्हणतात. चांदीपुरा व्हायरसची माहिती समोर येताच देशात खळबळ उडाली आहे. देशातील आरोग्य यंत्रणा यामुळे सतर्क झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील साबरकांठा आणि अरावली जिल्ह्यात चांदीपुरा व्हायरसमुळे चार मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोकं चिंतेत आहेत.
चार मुलांचा चांदीपुरा विषाणूमुळे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या विषाणूची लागण झालेल्या दोन बालकांवर हिंमतनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सर्व बालकांचे रक्ताचे नमुने पुष्टीकरणासाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे पाठवण्यात आले आहेत.
चांदीपुरा व्हायरस म्हणजे काय?
या व्हायरसचे पहिले प्रकरण महाराष्ट्रात 1966 मध्ये नोंदवले गेले होते. नागपूरच्या चांदीपूरमध्ये या विषाणूची माहिती समोर आली होती. म्हणून त्याला चांदीपुरा व्हायरस असे नाव देण्यात आले. 2004 ते 2006 आणि 2019 मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हा विषाणू आढळून आला होता. चांदीपुरा हा एक आरएनए विषाणू आहे. जो मादी फ्लेबोटोमाइन माशीद्वारे पसरतो. डासांमध्ये आढळणारा एडिस हा त्याच्या प्रसारास कारणीभूत आहे.
चांदीपुरा विषाणूचा सर्वाधिक परिणाम हा १५ वर्षांखालील मुलांवर होतो.या वयातील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. चांदीपुराच्या उपचारासाठी अद्याप कोणतेही अँटी-व्हायरल औषध बनलेले नाही.
चांदीपुरा व्हायरसची लक्षणे कोणती?
चांदीपुरा विषाणूची लागण झाली तर रुग्णाला ताप येतो. यात फ्लूसारखी लक्षणे आणि गंभीर एन्सेफलायटीस आहे. एन्सेफलायटीस हा एक आजार आहे ज्यामुळे मेंदूला सूज येते.
