बैल पोळा सणाला शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी
यवतमाळ : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झालीय. तर, अनेकांच्या शेतातील हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे. परिणामी आज शेतकऱ्यांचा सण असलेल्या बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी असल्याचे चित्र पुढे आले आहे. अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाच्या सक्रीयतेमुळं राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.
तर विदर्भ मराठवाड्यात पावसानं सर्वत्र एकच हैदोस घातला असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे. तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती ओढावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं आज देखील विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पावसाचा जोर लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात सलग दोन दिवसाच्या पावसाने जिल्ह्यातील 16 तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलं आहे. यावर्षीच्या पावसाळ्यातील हा सर्वांत मोठा पाऊस मानला जात आहे. या पावसाने शेत शिवारातील पीक खरखून गेली आहे. तर जवळपास 200 घरांची पडझड झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 24 तासांमध्ये 83 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक 129 मिमी पावसाची नोंद वणी तालुक्यात करण्यात आली. पुसद, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, घाटंजी, महागाव आणि उमरखेड तालुक्याला या पावसाचा सर्वधिक फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार साडेचार हजार हेक्टरचे नुकसान यात झाले असले तरी वास्तवात मात्र हेच नुकसान आठ ते दहा हजार हेक्टर वर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोळा या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल आहे. परिणामी, या परिस्थितीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
