SCO बैठकीच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान संबंधांबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच यावेळी भारत पाकिस्तान आणि इतर शेजारी देशांशी आर्थिक, सुरक्षात्मक आणि व्यापारविषयक सहकार्याचे मुद्द्यांवर देखील चर्चा करणार आहे. या बैठकीत दहशतवाद, सीमावाद, आणि व्यापारातील वाढ यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. इस्लामाबादमध्ये या शिखर परिषदेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाकिस्तानने ठेवली आहे.
नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ही सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. २३ वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदत यावेळी पाकिस्तानमध्ये पार पडणार आहे. यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. या दौऱ्याचे महत्त्व विशेष आहे, कारण ९ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचा असा उच्चस्तरीय दौरा पाकिस्तानामध्ये झाला आहे. याआधी २०१५ मध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. दरम्यान आपल्या भाषणार एस. जयशंकर यांनी पाकला खडे बोल सुनावले आहेत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे आपल्या भाषणात म्हणाले, ” एकमेकांमधील विश्वास कमी झाला असे, सहकार्य मिळत नसेल, चांगले शेजारी असल्याची कमतरता जाणवत असेल तर त्यामागे असणारी कारणे शोधली पाहिजेत. यासाठी प्रामाणिकपणे चर्चा होणे आवश्यक आहे. एससीओ देशांमध्ये एकतर्फी अजेंडा नाही तर वास्तविक भागीदारी असली पाहिजे. तसे होणार नसल्यास विकास देखील होणार नाही.”
पुढे बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, “एससीओच्या आर्टिकल १ मध्ये आमचे उद्दिष्ट आणि कर्तव्ये स्पष्टपणे सांगितलेली आहेत. एकमेकांमध्ये मैत्री, विश्वास, शेजारील देशांशी चांगले संबंध असणे आणि क्षेत्रीय सहकार्य वाढवणे असे त्यात सांगण्यात आले आहे. या चार्टरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद, कट्टरतावाद यांचा उल्लेख असून, त्याविरोधात एकजुटीने लढले पाहिजे. सद्य स्थितीत याचा सामना करणे जास्त गरजेच बनले आहे. ”
कडक सुरक्षा तैनात
SCO बैठकीच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान संबंधांबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच यावेळी भारत पाकिस्तान आणि इतर शेजारी देशांशी आर्थिक, सुरक्षात्मक आणि व्यापारविषयक सहकार्याचे मुद्द्यांवर देखील चर्चा करणार आहे. या बैठकीत दहशतवाद, सीमावाद, आणि व्यापारातील वाढ यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. इस्लामाबादमध्ये या शिखर परिषदेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाकिस्तानने ठेवली आहे. हॉटेल्स आणि परदेशी शिष्टमंडळांच्या मुक्कामासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
एस. जयशंकर यांचा हा दौरा भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये मोठे बदल घडवणार नाही. मात्र या परिषदेच्या माध्यमातून बहुपक्षीय सहकार्य आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित करत आहे. भारतासाठी हा दौरा SCO मधील आंतरराष्ट्रीय सहभागाचे महत्त्व आणि पाकिस्तानशी कायम ठेवायच्या संवादाची गरज यावर आधारित आहे.
