काँग्रेस नेत्याचे जोरदार टीकास्त्र
मुंबई : राज्याच्या वर्तुळामध्ये सध्या सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याची चर्चा आहे. भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. यावरुन राजकारण तापले असताना काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान जोरदार टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या प्रचारामध्ये वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुन महाविकास आघाडीसह अजित पवार यांनी देखील रोष व्यक्त केला होता.
नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेऊन सदाभाऊ खोत यांच्या टीकेवरुन जोरदार रोष व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीची संस्कृती नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत. सदाभाऊ खोत यांनी केलेली टीका अत्यंत खालच्या पातळीवरची असून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. शरद पवार यांच्याबद्दल गलिच्छ भाषा वापरणारे सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा घणाघात नसीम खान यांनी केला आहे.
माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल वापरलेल्या भाषेचा तीव्र शब्दात निषेध करून नसीम खान म्हणाले की, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख यांच्यापासून सर्वच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात विकासाचे राजकारण केले आहे. राज्याची प्रगती कशी करता येईल यावर त्यांनी भर दिला. विरोधकांवर टिका करतानाही तारताम्य बाळगण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे पण सदाभाऊ खोत यांच्या सारखे काही लोक वरिष्ठ नेत्यांबद्दल बोलतानाही अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरतात हे चुकीचे आहे. राज्याच्या विकासात सदाभाऊ खोत यांचा काहीही वाटा नाही, विधानसभा निवडणुकीत जनता अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही नसीम खान यांनी दिला आहे.
