सातारा प्रतिनिधी : शिवसागर जलाशय, वासोटा किल्ला, वजराई- ठोसेघर धबधब्यासह सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जंगल परिसरात पावसाळ्यात जळवा आढळतात, परंतु आता वेण्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात या जळवा आढळून येत असल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढलीये.
त्यामुळे केवळ जंगल परिसरात आढळणा-या जळवांनी आता नदीपात्रांच्या गावांसाठी धोक्याची घंटा वाजवलीये.
साता-यातील वेण्णा नदीच्या पात्रात रक्तपिपासू जळवांनी विळखा घातलाय. साधारणतः वाहत्या नदीपात्रात जळू आढळत नाही. पण अचानक वेण्णा नदीत जळू दिसू लागलेत. कण्हेर धरणापासून संगममाहुलीपर्यंतच्या नदीपात्रात साधारण सहा ठिकाणी मोठ्या प्रमाणात, तर अन्यत्रही त्यांचा कमी- अधिक प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचं प्राणिशास्त्र अभ्यासकांच्या पाहणीत आढळलंय.
जळू हा पाण्यात राहणारा कृमी :
– गांडूळाचा जवळचा नातेवाईक
– जळूच्या शरीरावर रिंग आढळून येतात
– जळू ओलसर जागेतच जिवंत राहू शकतात
– जळू हा प्राण्याच्या अंगातील रक्त शोषून घेतो
– जळू हे मासे, बेडूक, गाई, म्हशी किंवा कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर सुद्धा जगतात
– जगभर जळू या प्राण्याच्या 300 जाती आहेत
नदीतील प्रदूषण, सांडपाण्याचा वाढता विसर्ग आणि हवामानातील बदल यामुळे जळव्यांची संख्या वाढल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नदीवर धुणे धुण्यासाठी आलेल्या महिला, लहान मुले त्याचबरोबर पाणी पिण्यासाठी येणा-या जनावरांच्या तोंडाला या जळवा लागल्यास एखादा आजार बळावण्याची शक्यता प्राणीशास्त्रज्ञांनी व्यक्त केलीये. साता-यातील वेण्णा नदीच्या पात्रातून सातारा शहराला पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे जळवांच्या वाढत्या समस्येकडे स्थानिक प्रशासन आणि पर्यावरण विभागानं लक्ष देण्याची गरज आहे
