सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जडणघडणीत व उत्कर्षात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे थोर देशभक्त व स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांची पुण्यतिथी शुक्रवार दिनांक २७/१२/२०२४ रोजी बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथे संपन्न झाली.
यावेळी बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे म्हणाले, किसनवीर आबांनी स्वातंत्र्यापूर्वी अंगीकारलेले देश सेवेचे व्रत निस्वार्थीपणे पार पाडणेसाठी लोक प्रतिनिधीत्वाची पदे जबाबदारीने व यशस्वीरीत्या भूषवली. या कारकिर्दीत धोम धरण व सर्वदूर दुष्काळी भागात घेऊन जाणारे धोम कालवे, किसनवीर महाविद्यालय, किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेण्यास सज्ज असलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा विविध संस्था सुरु करणेमागे आबांचा मोठा वाटा आहे.
यावेळी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, आबासाहेब वीर यांची कारकीर्द सामाजिक बांधिलकीने परिपूर्ण, निस्वार्थी तत्वनिष्ठ आणि सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणारी होती. जिल्हयाचे सर्वांगीण विकासासाठी, जिल्हयातील प्रत्येक तळागाळातील घटकांचा, सहकारी संस्थांचा, सहकार चळवळीचा तसेच औद्योगिक प्रगती होणेसाठी तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेत किसनवीर आबांचा मोठा वाटा आहे. बँकेला सुरुवातीपासूनच यशवंतराव चव्हाण, आर.डी. पाटील, बाळासाहेब देसाई, आबासाहेब वीर, इत्यादी नेत्यांचे चांगले नेतृत्व लाभलेमुळे बँकेची चांगली प्रगती झाली आहे. बँक ग्रामीण भागातील तळागाळातील शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचली असून जिल्ह्यामध्ये ३२० शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक विविध प्रकारच्या सेवा देत आहे.
याप्रसंगी बँकेचे संचालक प्रदीप विधाते, सुनील खत्री, लहुराज जाधव, सुरेश सावंत, संचालिका सौ. कांचन साळुंखे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे बँकेचे विविध विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधिक्षक, सेवक यांनी आबासाहेब वीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र आदरांजली वाहिली .
