सातारा : गावाच्या गरजा ओळखून जलसंधारण, कृषी, ग्रामविकास कामांची निवड करा. त्यासाठी लोक सहभागाची आवश्यकता असून योग्य प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याची खात्री करून संबंधित कामांना सीएसआर फंडातून मदत उपलब्ध करून दिली जाते. राज्यात नाम फाउंडेशनने शेकडो गावांना विकासात्मक प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली आहे. जिल्ह्यातील ज्या गावांना लोकसहभागातून विकासकामे करायची आहेत, त्यांना सीएसआर फंडातून मदत उपलब्ध होईल, असे प्रतिपादन नाम फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्र येथे जिल्ह्यातील महिला सरपंचांना सीएसआर फंडाची मदत होण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाम फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात, दीपस्तंभ फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय जोशी, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.बी.एस. सावंत, नाम फाऊंडेशनचे समन्वयक बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपस्तंभ फाऊंडेशनचे अमेय जोशी यांनी, कंपन्यांकडून सीएसआर फंड देताना गावाची गरज, त्याची उपयुक्तता, लोकसहभाग, अंमलबजावणी, शाश्वतता विचारात घेतली जाते. दीपस्तंभ फाऊंडेशन जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, सौरऊर्जा वापर, महिला सक्षमीकरण, यासाठीच्या कामांना सीएसआर फंडातून मदत उपलब्ध करून दिली जाऊ शकते. योग्य प्रस्ताव आल्यानंतर गुणवत्तापुर्वक कामे करुन घेण्याची जबाबदारी घेणार्या गावांना नक्कीच मदत करु. यासाठी गावाने पुढाकार घेतला तर आम्ही सोबत आहोत, असा विश्वास व्यक्त केला.
जितेंद्र भोसले यांनी, शासन निधीतून न होणारी कामे गावाच्या विकासासाठी पुरक असतील तर सीएसआर फंड मिळू शकतो. यासाठी गावाचा लोकसहभागाची गरज असून लोकवर्गणी आवश्यक असते. सरपंचांनी पुढाकार घेऊन सीएसआर फंडातून करावयाच्या कामांचे प्रस्ताव सरपंच परिषदेकडे दिल्यास त्याला योग्य मदत मिळवून देऊ, असे सांगितले.
बाळासाहेब शिंदे यांनी, जलसंधारण, शिक्षण या कामांना प्राधान्य देऊन प्रस्तावांना योग्य खात्री करून नाम फाऊंडेशन, परांजपे ऑटो कास्ट प्रायव्हेट लिमिटेड ग्रुपकडून शक्य ती मदत करु, अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविक प्राचार्य विजय जाधव, तर आभार डॉ.बी.एस. सावंत यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील महिला सरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
