नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकाल 2024 लागल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 9 जूनला सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीतील नेत्यांनी पंतप्रधान मोदी 3.0 सरकारच्या स्थापनेसाठी आत्मविश्वास आणि उत्साह व्यक्त केला. भविष्यातील भारताच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यात पंतप्रदान नरेंद्र मोदी हे यशस्वी होतील, असा विश्वास यावेळी एनडीएतील घटक पक्षानं व्यक्त केला.
आगामी 5 वर्षात देश तिसऱ्या क्रमांकाची बनेल अर्थव्यवस्था : नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. यावेळी भाजपाला त्यांच्या सहयोगी पक्षाच्या आधारानं सत्ता स्थापन करावी लागली. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीवर काय प्रतिक्रिया देणार याकडं देशाचं लक्ष लागलं होतं. एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीवर आनंद व्यक्त केला. शपथविधीनंतर ते म्हणाले की, “आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे. 50-60 वर्षानंतर देशाला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान लाभला आहे. ही किमया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवली. येत्या 5 वर्षात भारताला सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय आहे. हे ध्येय येत्या 5 वर्षात पूर्ण होऊन देशाचा विकास होईल.”
हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण : नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. लोक जनशक्ती पार्टीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात चिराग पासवान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी आपली भावना व्यक्त केली. “हा माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रम घेऊन पूर्ण करण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावेन,” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. “लोक जनशक्ती पार्टीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा विश्वास दाखवला. यावेळी त्यांनी आम्हाला 5 जागा दिल्या आणि त्या सर्व जागा मी जिंकून दाखवल्या आहेत.”
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होईल : मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होईल, याची खात्री आहे. देशातील जनेतनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचा विकास करण्यासाठी पुन्हा आशीर्वाद दिला. याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. बारत पुन्हा एकदा विश्वगुरू होईल, असं कैलास विजयवर्गीय यावेळी म्हणाले.
पहिल्या आणि दुसऱ्या टर्मपेक्षा खूप काम करायचं आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हिंदुस्थानी आवाम मोर्चा ( धर्मनिरपेक्ष ) पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. हिंदुस्थान आवाम मोर्चाचे नेते जीतन राम मांझी यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. “आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या टर्मपेक्षा जास्त काम करू हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार आहे. तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं ध्येय पुढं ठेवलं आहे. त्यामुळे आम्हाला खूप मेहनत करायची आहे,” असं ते म्हणाले.
जी जबाबदारी मिळेल, ती मनापासून पार पाडेल : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या या संपूर्ण शपथविधी सोहळ्याबद्दल मला खूप आनंद झाला. नरेंद्र मोदी यांनी आदरणीय पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात घेतलेल्या शपथेचा सोहळा पार पडणं हा आयुष्यातील खूप मोठा अनुभव होता. मला जी काही जबाबदारी मिळेल, ती मी मनापासून पार पाडेन, आम्ही वेगानं काम करू” असं टीडीपी नेते राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केलं.
