फुलांच्या संरक्षणासाठी पठाराला तंगूसच्या जाळीच कुंपण
सातारा : जागतिक वारसास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या व आपल्या रंगीबेरंगी सौंदर्याने प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर मॉन्सूनपूर्व पावसाने हिरवी चादर पसरली असून, पठाराच्या संरक्षणासाठी कास पठार कार्यकारी समितीमार्फत तंगुसाची जाळी बसवण्यात येत आहे.
पठारावर यापूर्वी लोखंडी जाळी बसवण्यात आली होती; पण त्यामुळे कासच्या फुले बहरण्यास फटका बसू लागला, तसेच पठारावरील वन्यप्राण्यांच्या आवास तसेच अधिवासात येणारा अडथळे लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी ही जाळी प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली.
कासच्या शेकडो हेक्टर पठारावर आगामी हंगामाच्या दृष्टीने हजारो पर्यटकांना नियंत्रित करणे अवघड काम असल्याने तात्पुरती तंगुसाची जाळी फुलांच्या हंगामाच्या काळापुरती बसवण्यात येत आहे. जुलै महिन्यापासून कासवर छोटी-मोठी फुलांची दुनिया बहरण्यास सुरुवात होईल. आगामी हंगामाच्या दृष्टीने छोटीमोठी कामे कास पठाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कास समितीमार्फत सुरू करण्यात आली आहेत.
कासचा फुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर कासवर पर्यटकांचा लोंढा वाढतो. पर्यटक फोटो काढण्यासाठी फुलांमध्ये कसेही घुसून नासधूस करतात. फुलांना उपद्रव होऊ नये तसेच त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून जाळी बसवली जात आहे. –सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती
