पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले पालखी सोहळ्याचे स्वागत
सातारा : माऊली माऊली, विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज सातारा जिल्ह्यात पाडेगाव, ता. खंडाळा येथे आगमन झाले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते – पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार संजय जगताप, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुण्याचे पोलीस अधिकारी पंकज देशमुख, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, खंडाळा तहसीलदार अजित पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, पालखी सोहळा विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, योगी निरंजन नाथ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तसेच पोलीस विभागाने पालखीला मानवंदना दिली. यानंतर पालखीच्या सातारा जिल्ह्यातील आगमनवेळी नीरा नदीत पादुकांचे स्नान संपन्न झाले. स्वागतानंतर पालखी सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. पालखी आज आणि उद्या लोणंद मुक्कामी असणार आहे.
पालखी सोहळ्या दरम्यान पालकमंत्री देसाई यांच्या वतीने वारकर्यांसाठी फळ वाटप करण्यात आले. वारकर्यांनी मोठ्या संख्येने या फळ वाटपाचा लाभ घेतला.
पालखी सोहळ्यात वारकर्यांना सर्व सोयी सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा व्यवस्थित व निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले.
