विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोर्हे यांची माहिती
सातारा : राज्यातील वातावरण गढूळ असलं तरी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमुळे महिलांत उत्साहाचे वातावरण आहे. यातून राज्यातील अडीच कोटी बहिणींना लाभ मिळेल. त्यामुळे या योजनेकडे दुषित म्हणून पाहू नये. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात महायुतीलाच चांगले यश मिळेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी व्यक्त केला.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपसभापती गोर्हे बोलत होत्या. यावेळी शिंदे सेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, उपनेत्या कलाताई शिंदे, सांगली संपर्कप्रमुख सुनीता मोरे, सातारा जिल्हा महिलाप्रमुख शारदा जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सातारा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील महिलांचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी आल्यानंतर गोर्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उपसभापती गोर्हे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्यावेळी सातारा येथे कार्यक्रमाच्यानिमित्ताने येणे झाले होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला संमिश्र यश मिळाले. शिवसेनेचेही सात खासदार निवडून आले आहेत. आताच्या विधानसभा निवडणुकीतही युतीला यश मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. याची मदत याच महिन्यात महिलांना मिळणार आहे. या योजनेमुळे महिलांत आत्मविश्वास आला असून उत्साहही निर्माण झालेला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत दीड कोटी अर्ज आले आहेत. 15 लाखांच्या आसपासून नामंजूर झाले आहेत, असे सांगून उपसभापती गोर्हे पुढे म्हणाल्या, ज्या महिलांचे अर्ज बाद झालेत, ते कायमस्वरुपी नाहीत. काही तांत्रिक चुका राहिल्या असतील. तरीही काही महिला या योजनेपासून दूर राहिल्यातरी त्यांना इतर योजनांमधून लाभ देता येऊ शकतो. विधानसभा निवडणुकीपुरतीच ही योजना नाही. कायमस्वरुपी योजना चालणार आहे. त्यामुळे या योजनेबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
बहिणीला पैसे मिळणार म्हणून सावत्र भावांना पोटशूळ…
शिंदे सेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी विरोधकांवर जोरदार टिकास्त्र सोडले. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना लोकप्रिय ठरली आहे. बहिणीला पैसे मिळणार म्हणून सावत्र भावांना पोटशूळ उठलाय. सावत्र भाऊ याला भीक म्हणतात. पण, भाऊ हा बहिणीला ओवाळणी देतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या बहिणीच सावत्र भावांना निवडणुकीत जागा दाखवतील. तसेच या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर काहीही बोजा पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
