मुंबई : गणेशोत्सव आणि कोकण हे एक अनोखं समीकरण आहे. कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते. गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी पहिली पसंती राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला दिली आहे. मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या सर्व एसटी बसेस फुल्ल झाल्या आहेत.
येत्या 7 सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. कोकणात गणपतीसाठी एसटीच्या ४२०० गट आरक्षणासह एकूण ४९५३ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत. मुंबईतून कोकणात गणपती उत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा 03 सप्टेंबर ते 07 सप्टेंबरदरम्यान 5000 जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे.
चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी :
येत्या 3 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतुट नाते आहे. मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते.
तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार :
यंदा एसटीतर्फे सर्व विक्रम तोडून सुमारे ५००० जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, ३ ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.
