Explore

Search

April 12, 2025 8:47 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Maharashtra ITI Sanvidhan Mandir : संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ

मुंबई : १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.

कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती : 

संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.

 संविधान मंदिर : राज्यातील आयटीआयमध्ये संविधान मंदिराची स्थापना केली जाईल. या मंदिराच्या माध्यमातून संविधानाची शिकवण आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार सुद्धा नित्यनियमाने होईल. या ठिकाणी विविध शैक्षणिक कार्यक्रम, परिसंवाद, संवैधानिक घटनांचे स्मरण आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेल्या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतंर्गत “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी २५०० महाविद्यालयात प्रत्येक कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात १५ ते ४५ वयोगटातील दरवर्षी साधारण १ लाख ५० हजार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून या योजनेसाठीचा सर्व खर्च कौशल्य विकास विभाग करणार आहे.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना : महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला स्टार्टअप्सला निधी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी १०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून, सुमारे १००० स्टार्टअप्सना २५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री लोढा म्हणाले, “अनेक कौशल्य संपन्न आणि नीतिमंत व्यक्तिमत्वांनी भारत देशाला घडवण्यासाठी योगदान दिले आहे. आज त्यांच्या मेहनतीमुळे आपण आजवर इतकी प्रगती करू शकलो आहोत. संविधान मंदिराच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला संविधान निर्मितीचा इतिहास, त्याचे महत्व, येणाऱ्या पिढीला समजावे हा आमचा प्रयत्न आहे. येणारा काळ हा युवाशक्तीचा आहे, भारतातील युवकांसाठी सुवर्ण संधींचा आहे. त्यामुळे या युवकांना कौशल्य संपन्न आणि नीतिमंत बनवणे मी आपली जबाबदारी समजतो. असाच युवा फक्त भारतालाच नाही, तर जगाला सुद्धा उज्ज्वल भविष्याकडे नेण्याची ताकद बाळगतो. संविधान मंदिर आणि महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र उभे करण्यामागे आमचा हाच उद्देश आहे. नक्कीच युवकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. आदरणीय उपराष्ट्रपती जगदीप धनखडजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कार्यक्रमास येण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो!”

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy