सातारा : राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून प्राप्त झालेल्या सहा इलेक्ट्रिक घंटागाडीचे वितरण जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. जिल्ह्यातील कुडाळ, लिंब, अतित, खेडसह सहा ग्रामपंचायतींना या गाड्या मिळाल्या आहेत. या इ-घंटागाड्यांमुळे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेस गती येणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते गाड्यांचे वितरण झाले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय लाड, सहायक प्रशासन अधिकारी सुनील रांजणे, कुडाळचे सरपंच वीरेंद्र शिंदे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा तज्ज्ञ रवींद्र सोनावणे आदी उपस्थित होते. राज्य शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यस्तरावरून सहा ई-घंटागाड्या दिलेल्या आहेत. या वाहनांची मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी तांत्रिकदृष्ट्या पाहणी केली.
सातारा जिल्ह्यातील १ हजार ७४३ पैकी १ हजार ३०७ गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेली आहेत. यामध्ये ५ हजार लोकसंख्येवरील बाजारपेठांच्या ९४ ग्रामपंचायतींना टप्प्याटप्प्याने राज्य शासनाकडून ई-घंटागाडी देण्यात येणार आहे.
घंटागाडी वितरण कार्यक्रमाला जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील ऋषिकेश शिलवंत, अजय राऊत, गणेश चव्हाण, नीलिमा सन्मुख, फिरोज शेख, साकेत महामुलकर, विशाल भिसे, सविता भोसले, कोमल पाटील, सचिन जाधव, तालुकास्तरावरील पाणी व स्वच्छता कक्षाचे अमित गायकवाड, संतोष जाधव, प्रियांका देशमुख, प्रथमेश वायदंडे, फिरोज मुलाणी, मनोज खेडकर आदी उपस्थित होते.
