पुणे : राज्यात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा, रॅली, सभा यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर आज राज्यभरत सांगता सभा पार पडणार आहे, तत्पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ता हातात असल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांना झापलं आहे.
भोरमध्ये येऊन काही लोक (अजित पवार) सांगतात, साखर कारखाना चालवता आला नाही म्हणतात, दोन दिवसांपूर्वी मी शिरूर विधानसभेत होतो, तिथे देखील ते असंच म्हणाले. साखर कारखाना कसा चालवतो हे मी बघतो, अरे तुम्ही उपमुख्यमंत्री झालात, सत्ता तुमच्या हातात आली, सत्ता हातात आल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात, डोकं शांत ठेवायचं असतं, संकटात असणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, उलट हे दमदाटी करत आहेत. ठीक आहे, सत्ता हातात आहे, त्याचा असा गैरवापर तुम्ही करत आहात. पण तुमच्या या भाषेला आणि दमदाटीला मतदार अजिबात भीक घालणार नाही. यांचा निकाल आपल्याला वीस तारखेला घ्यायचा आहे, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.
संग्राम थोपटे यांच्यासाठी शरद पवारांची जाहीर सभा
भोरमधील काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्यासाठी शरद पवारांनी जाहीर सभा घेतली, यावेळी त्यांनी अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे. गेल्या लोकसभेत आमचे केवळ सात खासदार होते, मात्र, या लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेने मोठा विश्वास दाखवला आणि आमचे एकतीस खासदार निवडून दिले. आता महाराष्ट्राची निवडणूक आहे. यावेळी अमुलाग्र बदल घडवायचा आहे, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
महिलांचे – शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचा आहे, असं महायुतीतील नेते म्हणत आहेत. आता त्यांनी लाडकी बहीण योजना आणली, ते म्हणतात महिलांचा सन्मान करतोय. आता मला सांगा मोदी पंतप्रधान होण्याआधी पंधरा लाख देतो म्हणाले होते, मात्र ते पंधरा लाख दिले का? आता 1500 रुपये द्यायचे म्हणतायेत, आमचा याला विरोध नाही. मात्र, महिलांवर अत्याचार किती वाढलेत, यांच्या सत्ताकाळात 67 हजारांहून अधिक महिलांच्या तक्रारी आहेत. हे महिलांना रक्षण देत नाहीत, आणि 1500 रुपयांचे काय करायचं, असा सवाल यावेळी शरद पवारांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर यावेळी बोलताना संग्राम थोपटे यांना मंत्री करण्याचे शरद पवारांकडून संकेत देण्यात आले आहेत.
