ज्येष्ठ निरुपणकार मंदाताई गंधे यांच्या मार्गदर्शनाने अमृतमहोत्सवी सोहळ्याचा समारोप
सातारा : श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी सोहळा आणि विष्णू पंचायतन यागाची आज मंगळवारी दुपारी सांगता झाली. पूर्णाहूर्ती ब्रह्मवृंदांनी करत बलिदान करून पूजन झाल्यानंतर या 15 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या यज्ञाची विधिवत वेदमंत्रांच्या जयघोषात सांगता केली.
समर्थ सेवा मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या या अमृत महोत्सवी सोहळ्यामध्ये ज्येष्ठ निरूपणकार श्रीमती मंदाताई गंधे यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना, जीवनात श्रीराम म्हणायची सवय लावून घ्या. आपण तोंडाने म्हणा, मनात पण राम म्हणत रहा, कारण आपण जर जिवंतपणे राम म्हटलं नाहीत तर आपण गेल्यानंतर जिवंत असणाऱ्यांना आपल्यासाठी राम-राम म्हणण्याची वेळ येते. त्यामुळे जगतानाच आपण शहाणे व्हावे असे वाटत असेल तर इंद्रियांना वळण लावा आणि हेच वळण लावण्याचे काम समर्थ रामदास आणि तुकोबांनी केले आहे.
आपले विहित कर्म ठरलेले असेल ते करा. धर्मशास्त्रानुसार अध्यात्म ग्रंथात विधित्व कर्माचा उल्लेख आहे, आणि तसेच कर्म करत आपण जीवन जगा हा यज्ञ सांगता होत असताना धर्म यज्ञ सुरू होत आहे. आपणही सर्वांनी उद्यापासून होणाऱ्या या धर्मयज्ञात आहुती द्यावी आणि जीवनाचे कल्याण करावे असा उपदेश केला .
तत्पूर्वी या कार्यक्रमास ज्येष्ठ निरूपणकार चैतन्य महाराज देगलूरकर यांचे अतिशय सुरेख प्रवचन झाले. श्रीधर स्वामींनी आदर्श कार्य उभे करताना समर्थ सेवा मंडळाची स्थापना केली आमच्या देगलूर येथील गावात स्वामींनी भेट दिली होती. त्या काळात आजोबांची असलेली जवळीक यामुळे आम्हाला परिवाराला स्वामींचे कार्य जवळून अनुभवता आले. माणसाने जीवनात अभ्यास करता प्रकट होऊ नये, त्यापेक्षा झाकून असलेले बरे असेच समर्थांनी सांगितलेले आहे.
समर्थांचे चरित्र वर्णन करताना जे शुकासारखे वैराग्य पूर्ण आहेत, वशिष्ठा सारखे ज्ञानी आहेत व वाल्मिकी ऋषींसारखी ज्यांना मान्यता आहे. अशा तीन विशेष गुणांची ओळख आपल्याला समर्थांच्या चरित्रतून दिसून येते. संतांकडे अनंत गुण आहेत, संत चरित्र व त्यांचा आदर्श समाजापुढे उभा करत असताना त्यांच्या सकल गुणांचा विचार मानवी शक्तीच्या पलीकडे आहे हे गुण वर्णन करण्यासाठी आपले जीवनही अपुरे पडेल असे सांगितले.
याचा समारोप कार्यक्रमात मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी मंडळाच्या कार्याचा विस्तार उपस्थितपुढे सांगत सोहळा तसेच यागासाठी अनेक जणांचे विविध प्रकारे मोलाचे सहकार्य लाभले याचा नाम उल्लेख करत काही मान्यवरांचा सत्कार केला. याप्रसंगी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री गुरुनाथ महाराज कोटणीस, श्रीमती मंदाताई गंधे, रमेश बुवा शेंबेकर, बाळू बुवा रामदासी, अरविंद बुवा अभ्यंकर रामदासी यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कल्याणकारी रामराया या प्रार्थनेने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
