राज्यात वाढतायत चिकनगुनियाचे रुग्ण
चिकनगुनिया हा आजार कसा पसरतो
राज्यभरात डेंग्यु, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मुंबई पुण्यासह इतर ठिकाणी रुग्ण संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. बीएमसीच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मागील 3 वर्षांमध्ये चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण यंदाच्या वर्षी आढळून आले आहेत. बीएमसीच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये चिकुनगुनियाचे केवळ 22 रुग्ण आढळून आले होते. तर 2023 मध्ये 250 मुंबईकरांना या आजाराची लागण झाली होती. दरम्यान,यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत 578 जणांमध्ये चिकनगुनियाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आकडेवारीत दर्शवल्याप्रमाणे गेल्या वर्षीच्या तुलनेत, या वर्षाच्या शेवटच्या दहा महिन्यांमध्ये सुमारे 230% अधिक रुग्ण आढळून आली आहेत.
मुंबईमध्ये यंदाच्या वर्षी जास्त पाऊस पडला. शिवाय मुंबईमध्ये अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे ताडपत्री, बाहेर फेकलेल्या बाटल्या, भंगार, कचरा इत्यादी गोष्टी बाहेर साचून राहिल्या. तसेच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बांधकाम चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये डासांना पैदास करण्यासाठी चांगली जागा मिळते. शिवाय घरांमध्ये साठवून ठेवलेल्या पाण्यात सुद्धा डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे मुंबईसह इतर सर्वच ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया इत्यादींचे रुग्ण आढळून आले आहेत.
चिकनगुनिया हा आजार कसा पसरतो:
चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार आहे. तसेच हा आजार एडिस डासामुळे पसरतो. हे डास दिवसाच्या वेळी सक्रिय असतात. हे डास सगळ्यात आधी चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीचे रक्त शोषतात आणि इतरांना चावतात. चिकनगुनिया झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या आजाराची लागण झाल्यानंतर ताप, तीव्र सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, त्वचेवर पुरळ उठणे आणि थकवा इत्यादी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
नागपूर आणि पुण्यानंतर मुंबईमध्ये चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत नागपूरमध्ये सर्वाधिक 1199, पुण्यात 705 आणि मुंबई 578 रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर आहे, जिथे 484 रुग्णांची नोंद झाली आहे आणि पाचव्या स्थानावर असलेल्या अकोलामध्ये 373 रुग्णांची नोंद झाली आहे.बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, यंदाच्या वर्षी केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चिकनगुनिया हा आजार दर काही वर्षांनंतर सगळीकडे पसरतो.
या पद्धतीने करा स्वतःचे रक्षण:
- आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी साचून देऊ नका. यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते.
- आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
- घराच्या बाहेर असलेले पाण्याचे ड्रम किंवा टाक्या व्यवस्थित झाकून ठेवा.
