पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर परभणीतील स्थिती अतिशय गंभीर आहे. मी तिथे देशमुख कुटुंबीयांना भेटून आलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून स्थिती अतिशय गंभीर असून, काळजीपूर्वक नोंद घेतली पाहिजे, असे सांगितले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
रविवारी पुण्यातील सिंचननगर परिसरात भीमथडी जत्रेला पवार यांनी भेट दिल्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधला. यात्रेतूनच पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. यंदाचे साहित्य संमेलन दिल्लीला असून, उद्घाटनाला आपण उपस्थित राहावे, अशी सर्व साहित्यिकांची अपेक्षा आहे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारले असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
