सातारा : देशातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्या मांघरमध्ये मधपोळ्याला मेन किडा, तर मधमाश्यांना अमेरिकन फ्राऊलब्रुड रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे महाबळेश्वरसह जिल्ह्यातील मधपाळ संकटात आले आहेत. या रोगांमुळे मध उत्पादनात घट झाल्याने मधपाळ शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर मधमाशापालनाला मोठा वाव आहे. राज्यातील नैसर्गिक विविधता पाहता सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, वाई, पाटण, जावली तालुक्यात मधमाशीपालन व्यवसाय गत 70 वर्षांपासून सुरू आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षी खादी ग्रामोद्योग विभागाने देशातील पहिले मधाचे गाव देखील महाबळेश्वर तालुक्यातील मांघर येथे सुरू केले. मांघर गावातील एकूण लोकसंख्येच्या 90 टक्के लोक हे मधमाशी पालन करतात. त्यातून त्यांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला आहे. मधातून चांगला आर्थिक नफाही मिळत असल्याने मधपाळ शेतकर्यांचे चांगले जीवनमान सुधारले आहे. मात्र सध्या ऋतुचक्र बदलले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. थंडीचे प्रमाणही वाढले आहे. दाट धुकेही मोठ्या प्रमाणात पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम मध उत्पादनावर झाला आहे. पावसाची उघडीप लवकर न झाल्याने जंगलातील फुलोर्याला त्याचा फटका बसला आहे.
त्यातच या परिसरातील मधमाशांना अमेरिकन फ्राऊलब्रुड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे मधमाशा पोळ्यातच मृत्यूमूखी पडत आहेत. मधपोळ्यालाही मेनकिडाही लागला आहे. मधमाशांना फुलावर काम करता येत नाही. दर सात वर्षांनी कारवी वनस्पती फुलत असते. मात्र या वनस्पतीला फुले आल्यानंतरही पावसाने उघडीप घेतली नव्हती त्यामुळे मधाचे उत्पादनही घटले असल्याचे नानासाहेब जाधव यांनी सांगितले. याबाबत महाबळेश्वर येथील मधसंचालनालयाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता मांघर येथे भेट देवून वसाहतीची पाहणी केली जाणार आहे. तसेच मधपाळ शेतकर्यांशी चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले.
