शेकडो हातांनी केली सुरूवात; कोट्यवधी लीटर पाणी आडवण्याचा ग्रामस्थांनी केला निर्धार
कुसुंबी : पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जावली सारख्या अतिवृष्टीच्या तालुक्यातही उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे. पावसाळ्यात धो धो पाऊस पडत असला तरी हे पाणी वाहून जात असल्याने दीपावली नंतर पाण्याची समस्या सुरू होवून उन्हाळ्यात अक्षरशः गंभीर रूप धारण करते. हेच लक्षात घेऊन कुसुंबी ग्रामस्थांनी पाणी चळवळ हाती घेतली असून डोंगर भागात जलसंधारणाची कामे सुरू केली आहेत.
कुसुंबी गावाला पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. गावच्या वरच्या बाजूला डोंगर उतारावर शेकडो हेक्टर पडीक जमिनी असून मोठ मोठे पाण्याचे चर खोदून पाणी मुरवण्यात येणार आहे. डोंगर उतारावरून वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनी मध्येच मुरवल्याने खालच्या बाजूला असणाऱ्या गाव भागातील जमिनीतील पाणी पातळी वाढ वाढणार होणार आहे.
या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध जलमित्र सुशांत भिलारे यांच्या सहकार्याने रोटरी क्लबच्या माध्यमातून मोठी पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कुसुंबी गावचे सरपंच, उपसरपंच यांच्या पुढाकाराने ही चळवळ उभी राहत असून नुकतेच या कामाला उत्साहात सुरुवात झाली. यावेळी पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सदस्य यासंह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
