सातारा : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिनांक 6 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. दिनांक 6 ते 11 जुलै या दरम्यान पालखी लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या चार ठिकाणी मुक्काम करणार असून दिनांक 11 रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहे. यादरम्यान दिनांक 5 जुलै पासून सायंकाळी 6 ते 9 जुलै रात्री बारा या दरम्यान फलटण येथून पुणे निरा-लोणंद कडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन मार्गे वळवण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात नमूद आहे की, दिनांक 5 ते 8 जुलै या दरम्यान आदर्की फाटा येथून लोणंद कडे येणारी वाहतूक पालखी सोहळ्यातील येणार्या वाहना खेरीज इतर वाहनांना बंद करण्यात आली आहे. लोणंद येथून फलटण कडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटण कडे वळवण्यात आली आहे. पालखी सोहळ्याच्या दरम्यान फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. दिनांक 9 जुलै ते 11 जुलै या दरम्यान फलटण ते नातेपुते या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. नातेपुते कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक माळशिरस अकलूज बारामती मार्गे पुण्याला वळवली जाणार आहे. दिनांक 9 जुलै ते 11 जुलै या दरम्यान नातेपुते कडून फलटण मार्गे सातार्याकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे दहिवडी सातारा अशी वळवण्यात येत आहे नातेपुते कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते दहिगाव जांव बारामती मार्गे पुण्याला वळवली जाणार आहे
दिनांक 10 जुलै रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड मुक्कामी सकाळी सहा वाजता मार्गस्थ होणार आहे. सदर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण दहिवडी चौक कोळकी शिंगणापूर तीकाटणे वडले पिंप्रद बरड अशी वळविण्यात आली आहे. पालखी सोहळ्या दरम्यान पालखी मार्गावरील सोहळ्यातील वाहने सोडून इतर वाहने पर्यायी मार्गाने वाहने जातील याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समीर शेख यांनी केले आहे.
