तीन जण ठार
फलटण : आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर बरड (ता. फलटण) येथील बागेवाडी पेट्रोल पंपाजवळ कंटेनरच्या धडकेत कारमधील तीन जण ठार झाले. सागर रामचंद्र चौरे (वय ३४, रा. पाडेगाव, ता. खंडाळा), भाऊसाहेब आप्पा जमदाडे (वय ४५, रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा), नीलेश चंद्रकांत शिर्के (वय ४०, रा. वेटणे, ता. खटाव. मूळ रा. खटाव, ता. खटाव) अशी मृतांची नावे आहेत. काल पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दिवाळी सणासाठी हे सर्व दि. 31 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री विजापूरहून निघाले होते. त्यांची कार पहाटे 4.30 च्या सुमारास बरड गावच्या हद्दीत आली असता या कारला फलटण- पंढरपूर रोडलगत बागेवाडी पेट्रोल पंपाच्या जवळ फलटणहून पंढरपूरकडे जाणार्या कंटेनरने (क्रमांक एम. एच. 46. सीएल 9651) समोरा-समोर धडक दिली.
कंटेनरने दिलेल्या धडकेत कारच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर कंटेनरचालक पसार झाला. परंतु, बरड गावच्या पुढे आल्यानंतर राजुरी गावच्या हद्दीत या कंटेनरचा रेडिएटर फुटल्याने चालक कंटेनर तिथेच सोडून पसार झाला. या भीषण अपघाताची माहिती समजल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली.
